Friday, July 4, 2025

 तुमच्या वर कोण राज्य करते यावर तुमची बोली भाषा अवलंबून असते. उदा लॅटिन अमेरिकावर स्पॅनीश, पोर्तुगीजचा व भारतावर इंग्रजीचा प्रभाव आहे. पण त्यापुर्वी भारतावर प्रभाव होता तो खडी हिंदी भाषेचा. फारसी मिश्रित हिंदीने देवनागरी लिपी घेतली व स्थानिक भाषा घेतल्या त्यावेळी मराठ्यांच्या उत्तर भारतातील प्रभावामुळे लष्करी व कामकाजात मराठी व संस्कृत मिश्रित खडी हिंदीचा समावेश झाला. छत्रपतींच्या नेतृत्वाखाली बहुतांश मराठी शासक सरदार असल्याने (पेशवे, शिंदे, होळकर, गायकवाड ) मराठी युक्त हिंदी राज्य करायला मराठी सरदारांना सोपी झाली. त्यामुळे हिंदी बोलणे सर्वात सोपे कोणाला जात असेल तर मराठी माणसाला.

एकेकाळी मराठ्यांच्या मुळेच जास्त प्रचलीत झालेली हिंदी भाषा आता मराठी माणसाला कशी त्रासदायक होईल. आपल्या पेक्षा कितीतरी छोटी संख्येने लोक बोलत असलेली फ्रेंच, जर्मन, इटालीयन, स्विडीश भाषा टिकुन आहेत.कारण या भाषेतील लोक ज्ञानाधिष्ठित आस्थापनांच्या (कंपन्यांच्या) मार्फत जगावर राज्य करतात. भाषिक आक्रमणाची भिती न बाळगता आपल्या भाषेत अधिक अधिक ज्ञान निर्माण करणे व ज्ञानाधिष्ठित व्यवसायाने जगावर अधिराज्य गाजवणे हे मराठी व महाराष्ट्रासाठी महत्वाचे आहे.
तुम्ही जोपर्यंत आर्थिक व वैज्ञानिक बाबीत मराठी वापर करीत नाही तोपर्यंत मराठीची वृद्धी कठीण आहे लिंक्डइन सारख्या प्रोफेशनल सोशल मिडियावर मराठीत लिखाण करणारे १० लोक पण नाहीत यात मराठी माणसाचा कमीपणा नाही का? मराठी माणूस मराठी चित्रपट पहायला सिनेमागृहात जात नाही आणि तरीदेखील आशयसंपन्न चित्रपटांची मागणी करतो . हे म्हणजे दुटप्पीपणाचे लक्षण नाही का .
माझ्या पाहण्यातील बहूतांश लघू मध्यम वर्ग व मध्यम मध्यम वर्ग आपल्या मुलांना महागड्या स्थानिक इंग्रजी शाळेत घालतो. जिथे शिक्षक म्हणून कोणत्याही पदवीधारकांना भरले जाते. त्यामुळे मुलांना शिक्षणाच्या दर्जावर परिणाम होतो. पण पालक मात्र माझा मुलगा/गी इंग्रजी शाळेत शिकतो म्हणून खुष आणि कर्जात असतात. मराठीचा मुद्दा पुढे करणारे राजकारणीच इंग्रजी माध्यमाच्या शाळा उभारण्यात व भरपूर फी घेण्यात पुढे असतात. यामुळे सुंदर जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळा हळुहळू बंद होत आहेत.
त्यामुळे भाषेचा मुद्दा भावनिक न करता, आर्थिक ताकदीचा व व ज्ञानाचा केला पाहीजे. आणखी एक अवलोकन: इंग्रजी किंवा दक्षिण भारतीय चित्रपट तेलगू, तामिळ व कन्नड मधे भाषांतरीत होतात व सिनेमागृहात लागतात. पण मराठी माणूस मात्र याच चित्रपटाची हिंदी आवृत्ती पहायला गर्दी करतो. कितीही मोठा मराठी कलावंत असेल तरीही टिव्हीवर तो हिंदी कलाकारांना अवास्तव आदर देतो व प्रेक्षकही मुंबईत वर्षानूवर्षे रहाणाऱ्या हिंदी कलावंताचे एक तोडकेमाडके मराठी वाक्य ऐकूनही भारावून जातो. आणि टाळ्या वाजवतो. अरे तो महाराष्ट्राचा ईतके वर्ष भाग आहे आणि त्याला/तिला मराठी आले पाहीजे हि साधी अपेक्षा नको का?
मराठी येत असताना हिंदीचा वापर आर्थिक व ज्ञानाधिष्ठित प्रगतीसाठी कसा करता येईल हा विचार क्षणोक्षणी केला तर हिंदीचा राग व द्वेष निघून जाऊन मराठीचा उत्कर्ष व ईतर भाषांबद्दल आदर चालू होईल व मराठी भाषा शिक्षणाचे ईतर भाषिक लोकांसाठी वर्ग (क्लासेस) चालू होतील.
जय मराठी
प्रशांत पेडणेकर.

No comments:

Post a Comment